भरत जाधव यांनी रंगभूमीपासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रवासात केदार शिंदे, विजय चव्हाण, अंकुश चौधरी सारखी मित्रमंडळी भेटली. केदार आणि अंकुश कॉलेजपासूनचे मित्र मराठी सृष्टीत एवढे लोकप्रिय होतील याची कल्पनाही त्यांनी त्यावेळी केलेली नसावी. भरत जाधव मूळचे कोल्हापूरचे, मात्र त्यांचे शिक्षण परळ येथे झाले. गेल्या २३ वर्षांच्या प्रवासात सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच, गलगले निघाले. साडे माडे तीन, मुक्काम पोस्ट लंडन, नामदार मुख्यमंत्री गंप्या गावडे. जत्रा, खबरदार, पछाडलेला अशा लोकप्रिय चित्रपट आणि नाटकातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.
![bharat jadhav sonalee kulkarni](https://kalakar.info/wp-content/uploads/2023/02/bharat-jadhav-sonalee-kulkarni.jpg)
मराठी सृष्टीला लाभलेला सुपरस्टार अशी ओळख भरत जाधव यांनी मिळवली होती. आपले चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करतात, मग कलाकारांना मानधन कमी का दिले जाते. हा प्रश्न त्यांच्या मनात घर करून होता. याचा सारासार विचार करून त्यांनी आपले मानधन वाढवून घेतले होते. त्यावेळी सर्वात जास्त मानधन घेणारा पहिला मराठी अभिनेता म्हणून त्यांनी सुरुवात केली होती. आजवरच्या कारकिर्दीत भरत जाधव यांनी अनेक नायिकांसोबत काम केले. सोनाली कुलकर्णी आणि सिध्दार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटात त्यांनी घोटाळे हे विरोधी पात्र साकारले होते. घोटाळेचा लूक त्यावेळी प्रचंड प्रमाणात चर्चेत राहिला होता. यावरून काही लोकांनी टीका देखील केली होती.
![bakula namdev ghotale movie](https://kalakar.info/wp-content/uploads/2023/02/bakula-namdev-ghotale-movie.jpg)
मात्र या पात्राबद्दल आजही त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असतात. या पात्राबद्दल त्यांनी एक आठवण सांगितली. भरत जाधव पात्राविषयी म्हणतात की, १५ वर्षांपूर्वी जेंव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेंव्हा घोटाळेच्या लुकवर काही प्रमाणात टीका झाली होती. त्यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं की नंतर या पात्राला इतकं अमाप प्रेम मिळेल. युट्यूब वर कमेंट्स मध्ये घोटाळे या पात्रासाठी लोकं भरभरून कमेंट करतात. घोटाळेच्या तोंडी असलेले इरसाल संवाद अजूनही लोकं तितकंच एन्जॉय करतात. याचं कलाकार म्हणून विलक्षण समाधान वाटतं. या यशाचं सार श्रेय संपूर्ण टीमचं आणि लेखक दिग्दर्शक केदार शिंदेंच. १५ वर्ष झाली, आता घोटाळे सुटायला पाहिजे गड्या भकासपूर वाट पाहतोय.