अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या निस्सीम सौंदर्याचे अनेकजण चाहते आहेत. अनेक तरुणांची क्रश बनली असल्याने तिच्या प्रत्येक अदाकारीवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या जातात. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता माळी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. हास्यजत्राची होस्ट, रानबाजार सारखी वेबसिरीज आणि चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. मात्र आपला स्वतंत्र असा व्यवसाय असावा हे तिचं सुरुवातीपासूनच ठरलेलं होतं. प्राजक्ताने प्राजक्तराज या नावाने पारंपरिक दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. यानिमित्ताने तिने एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत प्राजक्ता जे काही बोलली त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
![prajaktaraj prajakta mali](https://kalakar.info/wp-content/uploads/2023/03/prajaktaraj-prajakta-mali.jpg)
प्रजक्ताराज हा व्यवसाय सुरू करण्यामागे तिचा एक खास उद्देश होता. पारंपरिक दागिने आपल्या महाराष्ट्रातच खूप कमी मिळतात. जास्त स्पर्धा नसल्याने मी हा व्यवसाय करण्याचे ठरवले. अर्थात प्रेक्षकांचे हे माझ्यावरील प्रेम असल्याने मला व्यवसायात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पण हा व्यवसाय सुरू करण्यामागे आणखी एक कारण आहे. अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे आहे. कुठल्याही एका गोष्टीत तुम्ही स्वतःला अवलंबून ठेवता कामा नये. कारण एक काळ गाजवलेली अनेक कलाकार मंडळी यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करताना दिसली आहेत. उतारवयात त्यांना राहायला घर नाही, जेवायला अन्न नाही अशा गोष्टी समोर येतात. तेव्हा कुठेतरी आपण व्यवसाय क्षेत्रात स्वतःला गुंतवून ठेवायला हवं. सुदैवाने माझ्या घरच्यांकडून मला विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले होते.
![prajakta mali ancient design prajaktaraj](https://kalakar.info/wp-content/uploads/2023/03/prajakta-mali-ancient-design-prajaktaraj.jpg)
मी जेव्हा जुळून येती रेशीमगाठी मालिकेत काम करत होते तेव्हा मधूगंधाने मला सांगितलं होतं. तुझ्याकडे स्वतःची गाडी आहे, घर आहे आणि बँकेत १० लाख रुपये आहेत तर तुला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तिने सांगितलेली ही गोष्ट माझ्या डोक्यात अगदी फिट करून घेतली होती. त्या दृष्टीने मी एकेक पाऊल पुढे टाकत राहिले. मला माझ्या भावाच्या लग्नात पारंपरिक दागिन्यांमध्ये इमिटीशन ज्वेलरी कुठेच मिळाली नाही. महाराष्ट्रात इमिटीशन ज्वेलरीमध्ये पारंपरिक दागिने बनवले जात नाहीत ही गोष्ट मनाला खटकली. त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवशाली परंपरेत खारीचा वाटा म्हणून मी या व्यवसायाकडे लक्ष्य दिले. प्राजक्तराज मध्ये १०० वर्षांपूर्वीचे दागिने मूळ डिझाईनमध्ये कुठलेही बदल न घडवता बनवले जातात.
यात विशेष बाब म्हणजे हे दागिने कारागिरांकडून हाताने बनवले जातात. असे कारागीर खूप कमी आहेत, त्यामुळे माझ्यासाठी सुरुवातीलाच ही एक मोठी अडचण होती. पण अशा उत्कृष्ट कारागिरांकडून मी हे दागिने बनवून घेते. यात २१ पानाड्यांनी सजलेला कोल्हापुरी साज, जोंधळे मणिगुंड आहेत. यात दोन्ही ओठांना झाकून ठेवेल अशी एक मोठी नथ आम्ही बनवत आहोत. या व्यवसायाला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकांचं हे प्रेम पाहून मी खूप खुश आहे.