देवावरची श्रद्धा आणि कामाप्रति निष्ठा असली की आपली सर्व दुःख, व्याधी दूर पळून जातात. गेल्या काही दिवसांपासून असेच काहीसे अनुभव मराठी कलाकारांनी घेतले आहेत. मधुराणी प्रभुलकर, स्वाती देवल, रुपाली भोसले, सागर कारंडे यांना दुखण्यामुळे काही काळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहावे लागले. मात्र पुन्हा फिट होऊन ते आपल्या कामात रुजू झाले. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने देखील घेतलेला आहे. मालिका, चित्रपट अशा माध्यमातून अश्विनी कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली आहे. पछाडलेला चित्रपटानंतर काही मोजक्या प्रोजेक्टमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली.

लग्नानंतर ब्रेक घेऊन अश्विनी मात्र घर संसारात रमली. कालांतराने चित्रपटातुन अश्विनीने पुन्हा एकदा पुनरागमन केले. सध्या विठ्ठल या आगामी चित्रपटासाठी ती महत्वाच्या भूमिकेत काम करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग चाकण परिसरात पार पडले. यावेळी अश्विनीच्या आजाराने डोके वर काढले, मात्र विठ्ठलाने आपल्याला पुन्हा एकदा उभं राहण्यास बळ दिले. असे म्हणत तिने एक सुखद अनुभव आणि आप्तेष्ट जिवलग मित्र मंडळींची मिळालेली साथ सांगणारी पोस्ट लिहिली आहे. यात अश्विनी म्हणते की, गेले काही दिवस पुण्या जवळ चाकण येथे एका चित्रपटासाठी शूट करत होते. गेले कित्येक महिने एक “दुखणं” चालू होतं, ज्याचे औषध उपचार सुरू होतेच. Shoot चालू असतानाच त्रास वाढला.

२ आणि ३ फेब्रुवारीला मला सुट्टी होती म्हणून धावत पळत पुण्यात येऊन डॉक्टर कडे गेले. तेव्हा त्यांनी सांगितलं की आता operation शिवाय सोडणारच नाहीत, नाहीतर दुखणं धोकादायक होऊ शकते. ४ तारखेला शूट असताना operation कसं करणार? शेवटी डॉक्टरांनी नियम बदलून २ तारखेला रात्री करायचं ठरवलं आणि ताबडतोब admit झाले. Operation व्यवस्थित पार पडले, २४ तासांनी, म्हणजे २ तारखेला रात्री ९ वाजता discharge दिला. घरी आले, बॅग घेऊन शूटिंग साठी रवाना झाले, चाकणला. पुढे सलग तीन दिवस काम करून आज् पुण्यात परतले. माझ्यात एवढी हिम्मत असेल असं मलाही वाटलं नव्हतं, पण रंगदेवतेच्या आशीर्वादाने शूट व्यवस्थित पार पडले.
माझ्या घराचे, मित्र परिवार, सहकलाकार आणि हॉस्पिटलचा सगळा स्टाफ, सर्वांनी या प्रसंगात माझी सोबत केली, काळजी घेतली. या सर्वांना thank you म्हणून मी त्या ऋणातून बाहेर पडणे कृतघ्न पणाचे ठरेल. योगायोग असा की मी करत असलेल्या चित्रपटाचं नाव “विठ्ठल”. या सर्वांच्या रूपाने तोच माझी पाठराखण करत होता याची मला पूर्ण खात्री आहे. आपण सर्वांनी मायेनी चौकशी केली, पण सगळ्यांना उत्तर देणे शक्य नव्हते म्हणून हा पोस्ट प्रपंच. असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या, तुमची अश्विनी.