स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने काही दिवसांपूर्वीच २५ वर्षांचा लीप घेतला आहे. या २५ वर्षांनंतर जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कहाणी दाखवण्यात येत आहे. नित्या आणि अधिराजच्या रुपात हे दोघे आता आमगावला जाऊन देवी आईच्या दर्शनाला गेली आहेत. तिथेच जयदीप आणि गौरीच्या प्रतिक्षेत असलेल्या माईंशी त्यांची भेट घडून येणार का हे येत्या काही भागात कळेल. तूर्तास मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला असल्याने अनेक नवीन पात्रांची एन्ट्री झाली आहे. तर अनेकांनी या मालिकेला निरोप दिला आहे.
![actress pratiksha pokale](https://kalakar.info/wp-content/uploads/2023/11/actress-pratiksha-pokale-jpg.webp)
पण या मालिकेत लवकरच शालिनीची एन्ट्री होणार आहे. तर अधिराजवर मनापासून प्रेम करणारी पावनी देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. पावनीचे अधिराजवर प्रेम आहे. ही भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा पोकळे हिने तिच्या अभिनयाने उत्तम वठवली आहे. प्रतीक्षा ही थिएटर आर्टिस्ट आहे. कॉलेजमध्ये असताना प्रतीक्षाने विविध नाट्य स्पर्धांमधून सहभाग दर्शवला होता. क्रिमीनल्स, काय घडलं त्या रात्री, माझी तुझी रेशीमगाठ, मन झालं बाजींद, लग्नाची बेडी अशा मालिकांमधून प्रतिक्षाने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत तिच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला आहे. त्यामुळे प्रतिक्षाची भूमिका उठावदार झाली आहे. पावनीने तिच्या लहानपणीच आईवडिलांना गमावलेले असल्यामुळे ती अधिराजच्या घरी राहायला असते.
![pratiksha pokale](https://kalakar.info/wp-content/uploads/2023/11/pratiksha-pokale-jpg.webp)
जेव्हापासून तिला कळायला लागलं तेव्हापासून ती अधिराजवर प्रेम करायला लागते. त्याला काय हवं नको ते बघते. पण आता नित्याच्या येण्याने पावनी त्यांचं हे नातं स्वीकारणार की विरोधी भूमिका पत्करणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास नित्या आणि अधिराजची एकमेकांसोबत ओळख झाली असून आता माईंच्या भेटीमुळे त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे मालिकेला एक रंजक वळण मिळालं आहे. त्यात आता लवकरच शालिनीची देखील एन्ट्री होणार असल्याने अधिराज आणि नित्या शालिनीच्या जाळ्यात ओढले जाणार की आणखी काही वेगळे घडणार हे लवकरच उलगडणार आहे.