मराठी चित्रपट तसेच मालिका, नाट्य अभिनेता ओंकार कर्वे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ओंकार कर्वे गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय शेती करतात. नाशिक येथे त्यांची तीन एकर शेती आहे. याशिवाय सातारा, सांगली, अमरावती, नगर, नाशिक आणि संभाजीनगर येथे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती करतात. यात प्रामुख्याने खपली गहू, तूर, ज्वारी, बाजरीचे पीक घेतले जाते. गाईचे तूप, सेंद्रिय गूळ, हळद अशी विविध प्रक्रिया केलेली उत्पादनं त्यांनी बाजारात आणली आहेत. दरम्यान अनेक कलाकारांना हाताला काम नव्हते. काही कलाकार मंडळी जोड व्यावसाय म्हणून हॉटेल क्षेत्राकडे वळली. तर काहींनी गावची वाट धरत शेतीत राबण्याचा निर्णय घेतला.
ओंकार सुद्धा याच मार्गावर पाऊल टाकताना दिसला. स्वप्न तुझे नी माझे, संघर्ष यात्रा, उचला रे उचला, स्वराज्य सौदामिनी ताराराणी, शिवप्रताप गरुडझेप, गाथा नवनाथांची या चित्रपट आणि मालिकांमधून ओंकार कर्वे यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. या यशाच्या प्रवासात ओंकार कर्वे यांना एक वाईट अनुभव आला. आपले काम पूर्ण व्हावे म्हणून सरकार दरबारी तुम्हाला जावे लागते. मात्र तुम्ही जर सामान्य व्यक्ती म्हणून जाणार असाल तर तुम्हाला निराशा पदरी पडते. हा अनुभव सांगताना ओंकार म्हणतो की, तुमची कामं व्हायला एकतर तुमच्याकडे भरपूर पैसे हवेत किंवा राजाश्रय हवा. किंवा काम करून देणाऱ्या व्यक्तीचा त्यात फायदा हवा किंवा तुम्ही कोणाच्या मर्जीतले असायला हवे. नाहीतर घंटा कोणी विचारात नाही तुम्हाला कितीही योग्य असलात तरी.
असे म्हणत ओंकारने देवेंद्र फडणवीस यांनाच टॅग करून गाऱ्हाणे मांडले आहे. ओंकारच्या खुलास्यानंतर चाहत्यांनी त्याच्या मताशी सहमत असल्याचे म्हटले आहे. मी त्यांच्या प्रक्रियेनुसार सर्व गोष्टी केल्या आहेत, मात्र आता या प्रणालीपुढे मी हात टेकले आहेत असे ओंकार हताश होऊन म्हणतो. आपल्या पोस्टमध्ये ओंकारने कोणते काम अडकले याबद्दल खुलासा केला नसला तरी तो शेती व्यवसाया संबंधित आहे हे स्पष्ट होत आहे. ओंकार कर्वे शेतीकडे वळण्याचे कारण त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. त्यावेळी ओंकार म्हणाला होता की, २००० ते २०१५ पर्यंत सगळं काही छान चालू होत. पण त्यानंतर काय घडलं माहीत नाही, चक्रच सगळं बदलून गेलं आणि काम मिळेनास झालं. कामं मिळत होती पण मानधन आणि लोकांच्या वैयक्तिक आवडी निवडीमुळे टीकेनाशी झाली.
खरं आणि स्पष्ट बोलणं हे ही मारक ठरलं. या विषयावर बोलण्या सारखं खूप काही आहे, पण आता तो विषय नको. असो, तर या सगळ्यामुळे अनावधानाने मी शेती या विषयाकडे वळलो. माझं शेती विषयात काम भलेही कमी असेल. शेतकऱ्यांचं काम, किती कष्ट घेतो हे जवळून पाहिलं आहे. काही वर्ग हा शिक्षित असून बुद्धीने शेती करतो. अशिक्षित शेतकरी वर्ग शिकला तरच मोठा होईल. शेतकऱ्याकडे पैसे नाहीत म्हणून हवी तशी शेती करू शकत नाही. सरकार दरबारी असलेल्या योजना त्याच्या पर्यंत पोहचत नाहीत. नैसर्गिक आपत्ती येते ती वेगळीच! ज्याला सरकार कारणीभूत होऊ शकत नाही. त्याला माणूस जबाबदार आहे, ग्लोबल वॉर्मिंग! तेव्हा माझ्यामते, कर्ज देणं हा उपाय नाही तर तुम्ही सुविधा उपलब्ध करून घ्या. त्या शेतकऱ्यांना सांगा, याची गरज आहे.